मनाला चटका लावून गेलेली गजानन ताजने या मित्राची "एक्झिट!" #A heartbroken Gajanan Tajne friend to "Exit!"



मंगळवार 30 जुलै रोजी दुपारला गजानन ताजने या मित्राच्या मृत्यूची बातमी कळली व धक्का बसला. सन 1999 च्या दरम्यान चंद्रपुरात विनोद सिंह (बबलु) ठाकुर संपादित जनमत रक्षक या नावाजलेल्या साप्ताहिकात गजानन यांच्यासोबत कार्य करण्याचा योग आला होता, त्यावेळेस पासून गजानन ताजने यांच्याशी घट्ट मैत्री झाली होती. अचानक त्याच्या जाण्याचे वृत्त हे मनाला चटका देऊन गेले. सन 1999 च्या दरम्यान चंद्रपुरात सरदार पटेल महाविद्यालयात पत्रकारितेचा (बीएमसी) हा पदविका अभ्यासक्रम नुकताचं सुरू झाला होता. त्यामध्ये दुसऱ्या टर्मला बहुतेक गजानन ताजने ने बीएमसी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. पत्रकारितेची आवड असलेला गजानन हा मुळचा वरोरा तालुक्यातील चारगाव येथील सदन शेतकऱ्याचा मुलगा ! पत्रकारितेची आवड त्याला चंद्रपूर ला खेचून आणली. शालेय शिक्षणापासूनच लिखाणाची आवड असल्यामुळे पत्रकारितेकडे सहाजिकच त्याचा कल-रस होता. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात असतांनाच त्यांनी जनमत रक्षक या साप्ताहिकाला काम मिळावे यासाठी अर्ज केला. त्याचा सुवाच्च अक्षरात व वेगळ्या ठावणीतील लिहिलेला अर्ज त्यावेळेसचे जनमत रक्षक चे संपादक शरद देशमुख यांना फार भावुन गेल्यामुळे त्याला मानधन तत्वावर नियमित स्तंभ लिहीण्याचे सांगण्यात आले. "शाल-जोडी" नावाचा नियमित स्तंभ जनमत रक्षक मध्ये गजानन यांचा चालायचं. अल्पावधीतच या स्तंभाने वाचकांची मने जिंकली. धारदार लेखनी, रोजच्या घडामोडींवर वेधक भाष्य करणारा "शाल-जोडी" हा स्तंभ गजानन ताजनेला बऱ्यापैकी ओळख देऊन गेला. "घरच्यांवर निर्भर न राहता आपल्याचं पैशावर शिक्षण घ्यावे" यासाठी गजानन ताजनेने तुकुम येथे किरायाच्या रूम मध्ये शिकवणी वर्ग सुद्धा चालू केला होता. तुटलेल्या अवस्थेतील ब्रेक, कमजोर असलेली जुनाट सायकल व साधा पेहराव ही गजानन ची त्यावेळेस ची ओळख आज ही स्मरणात आहे. त्यानंतर काही वर्ष जनमत रक्षक या साप्ताहिकात संपादक पदाची भूमिका ही त्यांनी चोखपणे बजावली. पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर गजानन नी सकाळ, निर्मल महाराष्ट्र, नवराष्ट्र या प्रथितयश वर्तमानपत्रातही जिल्हा प्रतिनिधी-शहर प्रतिनिधी म्हणून कार्य बजावले. धारदार प्रामाणिक टिका, वेधक-वेचक बोलक्या बातम्या, शिकण्याची वृत्ती यामुळे त्यांची लवकरच पत्रकारितेत एक नवी ओळख निर्माण झाली. नम्र, मृदू व मनमिळाऊ स्वभावामुळे गजानन याने आपला वेगळा चाहता वर्ग बनविला होता. गजानन च्या स्वभावामुळे ् तो पत्रकारितेत रमू शकला नाही, पत्रकारितेला राम-राम करीत त्याने जिल्हा परिषदेतीच्या जीवनोन्नत्ती अभियानात जिल्हा व्यवस्थापक म्हणून कार्य करीत होता. वयाच्या 48 व्या वर्षी अचानक त्याचा झालेला मृत्यू हा मन हेलावून गेला. पत्रकारितेत विविध वर्तमानपत्रामुळे मध्ये वेगवेगळ्या मोठ्या पदावर कार्य करू लागल्यामुळे त्याला सहाजिकच सन्मान देण्यासाठी "ताजने साहेब" असा उल्लेख केला तर "गजू" चं म्हणा असा त्याचा नेहमी मला आग्रह असायचा. "गजू" तुझी जीवनातील एकाएकी एक्झिट "जो आवडे सर्वांना, तो ची आवडी देवाला" अशीच राहिली. तू आज आमच्यात नसला तरी तुझी आठवण आम्हाला नेहमी राहील. हीच या निमित्त गजु ला श्रद्धांजली !

Post a Comment

0 Comments